कोरोना बातमीपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1070 झाली आहे. यापैकी 670 बाधित बरे झाले आहेत तर 390 जण उपचार घेत आहेत.
शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 43 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
14 ऑगस्टला रात्री 10 वाजे दरम्यान बल्लारपूर शहरातील गोकुळ नगर परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल्यास संपर्कातून तयार होणारे रुग्ण कमी झाले पाहिजे. त्यासाठी गृह अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांपासून तर बाधित नागरिकांपर्यंत आपल्यापासून इतरांना बाधा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. उद्यापासून अर्थात सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील तीन प्रमुख शहरांमध्ये लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. बल्लारपूर, गोंडपिंपरी व घुग्घुस हे तीन शहर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधिताची संख्या वाढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस ग्रामपंचायतमध्ये रविवार दिनांक 16 ऑगस्ट पासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री 12 वाजे पर्यंत सर्व किराणा दुकान सर्व किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने आस्थापना संपूर्णता बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार 17 ऑगस्ट पहाटेपासून 21 तारखेपर्यंत बल्लारपुर -बामणी बंद राहणार आहे.
गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. 16 ऑगस्टपासून 22 तारखेपर्यंत लॉक डाऊन पाडण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात 21 व 22 तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा देण्यासाठी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये सर्वाधिक बाधित हे बल्लारपूर शहरातील आहेत. या शहरातील आतापर्यंत बाधिताची संख्या शंभरावर गेली.गेल्या 24 तासात 15 बाधित पुढे आले आहे. चंद्रपूर महानगर बाधितांच्या संख्येत मागे नाही. या ठिकाणी 24 तासात 11 बाधित पुढे आले आहे. याशिवाय राजुरा 8, चिमूर 1, वरोरा 2, भद्रावती 2, कोरपना तालुका 1 व एक नागरिक तेलंगाना येथील रहिवासी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या 10 नागरिकांपैकी 8 बाधित जिल्ह्यातील आहे. या आठ बाधितांना पैकी मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये अन्य आजाराचे प्रमाण अधिक होते. कोरोना शिवाय त्यांना अन्य गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग होणारच नाही यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.