चंद्रपूर – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून शहर आठवडाभरासाठी लॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात पहिल्या दिवशी कडक अमलबजावणी होताना दिसून येत आहे. अत्यावश्यक रुग्णसेवा व मेडिकल वगळता सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो आहे.
जिल्ह्यातील 218 कोव्हीड रुग्णांपैकी 60 रुग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. शहरात अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी आजपासूनचा लॉक डाऊन अर्थात टाळेबंदी सुरू करण्यात आली आहे. ही जनतेसाठी सुरू करण्यात आलेली टाळेबंदी असून दुप्पट रुग्ण होण्याच्या गतीला यामुळे खीळ बसणार आहे.लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी प्रशासनातर्फे होत असून चंद्रपूर शहरातील जनता योग्य प्रतिसाद देत घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करीत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा कडकडीत बंद अर्थात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील डब्लिंग रेट आणखी कमी करण्यासाठी ही उपाययोजना योजना आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या एक लक्षात आले असेल की, गेल्या 10 दिवसात अचानक 200 पर्यंत आपले रुग्ण पोहोचले आहेत. कधीकाळी आपल्याकडे एकही रुग्ण नव्हता. परंतु गेल्या दहा ते वीस दिवसांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या वाढवण्याची साखळी सोडण्यासाठी ही उपाय योजना आहे. याशिवाय पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये तात्काळ माहिती देणाऱ्या अॅन्टीजेन तपासणीचा अधिक वापर केल्या जाणार आहे.त्यामुळे पहिल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनला कोणीही घराच्या बाहेर पडू नये.
घरात ज्याला कोणाला लक्षणे दिसेल त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी, चंद्रपूर शहर महानगरपालिकेशी किंवा 1077 व 07172 -261226 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनामार्फत केले जात आहे.
चंद्रपूरमधील रस्त्यांवर शुकशुकाट, कोरोनाची साखळी तोडण्यास चंद्रपूरकरांची एकजुट
Advertisements