चंद्रपूर – : तारुण्यात पदार्पण करणाऱ्या दोन युवा वाघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे. 10 जून रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ या गावालगतच्या तळ्याच्या काठावर एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चर्चा अजून सुरूच असताना याच भागातल्या घनदाट जंगलात आणखी दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. या भागातील गस्ती पथकाला कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह एक ते दीड वर्षे वयाच्या प्रौढ होऊ घातलेल्या बछड्यांचे असावेत, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे मृत्यू ज्या तळ्याच्या आसपास झाले आहेत, तिथेच काही माकडांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे तळेच दूषित झाले आहे काय किंवा कुणी या तळ्यातील पाण्यात मुद्दाम विष कालवले काय, याचा तपास वनविभाग करणार आहे. यासाठी या तळ्याच्या पाण्याचे नमुने वनविभागाने घेतले आहेत. दरम्यान ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प ज्या वाघांसाठी ओळखला जातो, त्या वाघांचे चार दिवसात तीन मृतदेह आढळून आल्याने वनविभाग मात्र हादरून गेला आहे. सीतारामपेठ हे गाव प्रकल्पाच्या अगदी सीमेवर आहे. या गावात कसल्या जाणाऱ्या शेतजमिनी देखील आहेत. त्यापैकी कुणी वाघांच्या वावरामुळे संतापून जात असा विषप्रयोग केला का, याचाही तपास केला जात आहे. सध्यातरी दोन्ही ठिकाणचे नमुने ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास वरिष्ठ वनाधिकारी करत आहेत.
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सीताराम पेठ भागात आणखी 2 वाघांचा मृत्यू
Advertisements